“नावात काय आहे ? गुलाबाला जरी दुसरे नाव असते
तरी त्याचा सुगंध तसाच राहिला असता.”
अशा आशयाचे वाक्य तुम्ही ऐकले असेलच. मी काही
नाटककार नाही. म्हणून जरा भाषा समजून घ्या. नाहीतर तुमच्यातला समीक्षक जागा होईल. (
काय वरवरची / उथळ भाषा वापरतो. व्हेरी चीप.) तरी पण ज्यांना माहीत नाही
त्यांच्यासाठी. हे वाक्य विल्यम शेक्सपिअरच्या रोमिओ आणि ज्यूलिअेट या प्रसिद्ध
नाटकातील आहे. शेक्सपिअरच्या या नाटकाचा अनुवाद मंगेश पाडगावकर
यांनी अतिशय समर्पक शब्दात केला आहे. त्यामुळे माझी वाक्यरचना थोडीशी अर्धीकच्ची वाटत असेल.
पण
एखाद्याच्या नावावरून त्याच्या व्यक्तिमत्वाची आपणास खरी ओळख होते का ? माझ्या मते
नाही. पण नावामुळे आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल काही प्रतिमा तयार होतात. आता
उदाहरणाच्या मदतीने आपण हे समजून घेऊया. काही प्रसंगाचे वर्णन करतो. त्यातील व्यक्ति
आपणास ओळखता येतात का ? ते पहा. व्यक्ति ओळखा. आता त्या व्यक्तीच्या विरुद्ध
स्वभावाची पण त्याच नावाची दुसरी व्यक्ति आपणास माहीत आहे का ते पहा. पण कल्पनाशक्तीच्या
जोरावरच. प्रत्येकाच्या अनुभवानुसार ह्या व्यक्ति वेगवेगळ्या असू शकतात. आपण ओळखा
पाहू ? असच काही खेळतो असं समजा.
एक नेता.
आपल्या शिरा
ताणून आपले मौलिक विचार हातवारे करून मांडत आहे. इतर नेत्यांच्या नकला करत आहेत.
सारख भ्रष्टाचाराविरोधी बोलत आहे. बोलत आहे पण त्याच कोणी मनावर घेत नाही.
कार्यकर्ते त्याच्या नावाचा जयघोष करत आहेत. त्यांच्या पूर्वजांचा. श्रोत्यांना
प्रश्न विचारत आहे.
एक खेळाडू.
यश
मिळाल्यावर शिव्या घालून आनंद व्यक्त करतो. यश मिळाले तरी अगदी स्थितप्रज्ञ असा
तो. नम्र म्हणा हवं तर. अगदी सहजतेने खेळतो. चांगला आहे पण जरा जास्तच शक्ती वाया
घालवतो. गुणवंत आहे पण आपल्या गुणवत्तेचा पूर्णपणे वापर करत नाही.
एक व्यक्ति.
तुम्हाला
आवडणारी. तुम्हाला न आवडणारी. तुमचा आदर्श. तुमचा मित्र. तुम्हाला सोबत हवीहवीशी
वाटणारी. आता कशाला आली ? अस वाटणारी, बर झालं आली. अस वाटणारी. धीर देणारी.
काहींना
स्वतःचे नाव खूप आवडते. तर काहीना इतरांचे. काहींना नाव बदलावेसे वाटते. काहींचे
नाव रूढी परंपरा बदलतात. काही देशांमध्ये नाव धर्माची ओळख ठरते. जातीची ओळख ठरते.
तर काही देशांची, प्रदेशांची नावे पर्वत, नदी, खंड, धर्म, वंश, पंथ आणि भाषा इ. अस
बरच काही ठरवतात. काहींची नाव धर्मावर आधारित असतात. धर्म कुठलाही असो. आता तर चक्रीवादळांनादेखील
नाव दिली जातात. यानंतर भुकंपाना दिली जातील. पुरांना दिली जातील.
जगातील
सर्वात उंच शिखराची देखील अनेक नावे आहे. तुम्हाला माहीत आहेत का ? वेगवेगळ्या देशात अशाच गोष्टी तुम्हाला दिसत
असतील. तपासून पहा. विज्ञानातल्या एककांची नाव देखील शास्त्रज्ञाच्या नावांवर
आहेत. तुम्हाला माहीत नसेल पण नवीन शिखरे, सापांच्या, कीटकांच्या, बेडकांच्या आणि
फुलपाखरांच्या नवीन प्रजातींची नाव देखील व्यक्तींना श्रद्धांजली म्हणून दिली जातात.
रस्त्यांना दिली जाणारी नाव तुम्हाला माहीत असतीलच. त्यावरून होणारे वाद सुध्दा. तलावांना
असणारी नावं, किल्ल्यांना असणारी नावं, घाटांची नावं, खिंडींची नावं, नद्यांची नावं
त्याचा इतिहास, त्यांचा भूगोल सांगतात. तुम्ही प्रवास करत असलेल्या स्थानकांची
नावं देखील काही व्यक्तींची असतील, नद्यांची असतील, एखाद्या धर्माचा बोध करून
देणारी, तुमच्यासमोर काही प्रतिमा निर्माण करत असतील.
आता
तुम्हाला प्रश्न पडला असेल...................... तर मुद्दा काय आहे ? नाव असूच
नये की काय ? नाव असूच नये असं कोणालाच वाटत नाही. पण जेव्हा नावांवरून आपण
दुराभिमान बाळगू लागतो तेव्हा मात्र हे खटकते. तो नकळत देखील असते. आपणास लक्षात
देखील येत नाही. नाव म्हणजे आपली समाजात फक्त एक विशिष्ट व्यक्ति म्हणून ओळख असते.
म्हणजे आपण एकावेळी हजारो लोकांचे संदर्भ लक्षात ठेऊ शकतो. पण आपण ते संदर्भ
आपल्या अनुभवांशी जोडतो. एका नावाच्या अनेक व्यक्ति आपल्या ओळखीच्या असतील तर आपण
त्यांच्या बद्दलच्या अनुभव आणि आठवणीतून अन्वयार्थ काढतो. म्हणजे शाळा, कार्यालय, कुटुंब,
,मित्र असे काहीशे ढोबळ संदर्भ. पण जेव्हा आपण नावाचा संबंध जात, धर्म, पंथ, प्रदेश
अशा काहीश्या गोष्टींशी जोडतो आणि आपले पूर्वग्रह करून घेतो. आपले संदर्भ बदलतात
तेव्हा विचार बदलतात. काहीवेळा काही नावांचा आपणास तिटकारा वाटू लागतो.
जर तुम्ही
प्रवास करत असाल तर किंवा अनोळखी माणसांशी संवाद साधत असाल तर. काही समान प्रश्नांची
आपण देवाणघेवाण करतोच. उदा. बहुतेक वेळा पहिला प्रश्न वेळेशी निगडीत असतो. म्हणजे...
गाडी लवकर आली ना. किंवा गाडी एवढ्यात यायला हवी होती. असच काही वेळ गेल्यावर ओळख
परेड सुरु होते. आणि इथून खरी समस्या सुरु होते. कारण अशा वेळी नावांच्या अक्षराची
देवाणघेवाण होते. तरी काही जरा जास्तच उत्साही असतात. त्यांना जरा खोल माहिती हवी
असते. तुम्हाला समजल असेलच. आणि तुम्ही ........... ना. यांना ओळखता का ? त्याना
ओळखता का ? किंवा त्यांना नको असलेले तपशील ऐकू आले तर मात्र काही आपल्या माणसात
खाणाखुणा होतात. आणि बोलणे अगदी मोजूनमापून किंवा होय किंवा नाही अशा उत्तरापर्यंत
येते. कारण, एवढे सगळे एका नावाने केले. काहीतरी लिहायचं विसरतोय (एखादा शब्द) अस
वाटत असेल ना. माहीत आहे. मुद्दामच. वापरा जन हो कल्पनाशक्ती.
ही समस्या
आपल्या देशातच नाही तर एका संपन्न, दोन्ही बाजूस महासागर असलेल्या देशातही आहे.
आपल्या देशातील एका अभिनेत्याला फक्त त्याच्या नावामुळे तिकडे मनस्ताप सहन करावा
लागला. ही फक्त एका प्रदेशाची नसून संपूर्ण जगाची समस्या आहे. जी सर्व समस्यांच्या
मुळाशी दुराभिमान आहे. कशाचा ? धर्माचा, जातीचा, वंशाचा, पंथाचा, प्रदेशाचा, भाषेचा
आणि अशा अनेक गोष्टींचा. आणि यांची सुरवात आपल्या नावापासून होते. आपण नकळत अशा
गोष्टींना खतपाणी घालत असतो.
हा सर्व
खटाटोप कशासाठी. तर गेल्या आठवड्यात एका लेखकाने, समाजसेवकाने, पर्यावरणवाद्याने जगाचा निरोप घेतला. त्याने आपले संपूर्ण आयुष्य
जलसंवर्धनासाठी खर्च केले पण कधीही प्रसिद्धीचा हव्यास केला नाही. त्यांच्या मते
माझ्या नावापेक्षा माझे विचार जास्त मोलाचे आहेत. आणि मग सहजच मनात प्रश्न आला. नावात
काय आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ बघून काही समजतंय का बघा. लेखक शोधा. ह्या पुस्तकावर
लेखकाने कोणताही स्वामित्व हक्क सांगितलेला नाही. तुम्हीसुध्दा हे पुस्तक प्रकाशित करू शकता.
आता मात्र मुद्दामच
दोन नाव लिहितो, शोध घ्या. काही सापडताय का.
१.
नरेंद्र दाभोळकर
२.
श्रीराम लागू.
विशेष सुचना –
हा लेख एकदा वाचून झाल्यावर वही आणि पेन सोबत घेऊन पुन्हा
वाचा. ओळखा पाहू या खेळात प्रत्येक वाक्यात तुम्हाला अभिप्रेत नावांची यादी करा.
आणि मग तुमच्या लक्षात येईल की ----
कल्पनाशक्ती
म्हणजे काय.
The Power of Imagination.
काका सोनार गणेश चित्र शाळा
© All Rights Reserved.
Comments
Post a Comment